बुद्धाच्या काळातील एक कथा आहे. एक भिक्षू राजपथावरून चाललेला असतो. महालातून नगरवधू (वेश्या) त्याला पाहते. संन्याशाच्या व्यक्तीमत्वात एक वेगळ्याच प्रकारचं सौंदर्य असतं. कारण तेथे असते स्वातंत्र्य आणि बंधनमुक्तता. तेथे असतं आकाश. आपला मार्ग तो स्वतःच निवडतो. तो स्वतःच नियंता असतो आणि यातूनच त्याचा आत्मविश्र्वास झळकत असतो. यातून प्रगत होतं एक समग्र, एकात्म व्यक्तित्व. अशा या व्यक्तिमत्वावर ती वेश्या मोहित होते, ती महालातून खाली उतरते, भिक्षूला प्रार्थना करते, ‘आपण माझ्या महालात चलावं, आज रात्रभर माझे पाहुणे व्हावं.’ भिक्षू तिच्याकडे बघतो नि म्हणतो, ‘तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या आज मोठी आहे. तु सुंदर आहेस, तरुण आहेस. आज मी आलो नाही तर तुझी रात्र रिकामी जाणार नाही, पण ज्या दिवशी तुझ्यावर प्रेम करणारा कोणीही नसेल, हे शहर तुला गावाबाहेर घालवून देईल, तू आक्रोश करशील पण ऐकणार कोणी नसेल, त्या दिवशी मी येईन.’
वेश्येला दुःख झालं, तिचा अपमान झाला. आजपर्यंत लोक तिच्या दारावर यायचे आणि ती नकार द्यायची. आज ती प्रथमच कोणाच्या तरी दारात गेली आणि विन्मुख होऊन परतली. एक वेदना घेऊन ती परतली.
वीस वर्षे लोटली. अंधाऱ्या रात्री रस्त्याच्या कडेला कोणी आक्रोश करीत होतं. रस्त्याने जाणारा भिक्षू तेथे आला, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरविला. तिला तहान लागलेली होती. भिक्षूने जवळच्या गावातून पाणी आणि दिवा आणला. भिक्षूने त्या नगरवधूला ओळखलेले होते. तिचे संपूर्ण शरीर महारोगानंं ग्रासलेलं होते, गावाने तिला फेकून दिलेलं होते. भिक्षूने तिचे डोकं मांडीवर घेतले आणि म्हणाला, ‘बघ मी आलो, प्रभूची केवढी कृपा, मी माझं वचन पूर्ण करू शकलो. वीस वर्षांपूर्वी तू दिलेलं निमंत्रण आज माझ्यापर्यंत पोहोचलं.’ वेश्येने डोळे उघडले नि क्षीण आवाजात म्हणाली ‘खूप उशीर झाला, आज आला नसतात तर बरं झालं असतं. त्या दिवशी मी तरुण होते, सुंदर होते…’
![](https://i0.wp.com/aispais.com/wp-content/uploads/2022/10/new-project-2021-06-16t123553.817_202106636066.jpg?resize=525%2C394&ssl=1)
भिक्षू म्हणाला, ‘आज तू अधिक ज्ञानी आहेस, जीवनाला तू अगदी जवळून पाहिलं आहेस-वेदना, दुःख आणि विषाद पाहिले आहेस. आज तुझ्याजवळ सुंदर शरीर नसेलही पण सुंदर आत्मा आहे. त्या दिवशी तुझ्याजवळ फक्त तुझं शरीरच होतं…